Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

प्रगती शुन्याकडे

प्रगती शुन्याकडे

प्रगती शुन्याकडे - विषय म्हंटलं तर मजेशीर पण तसाच गंभीर आणि विचार करायला भाग पाडेल असा आहे. प्रगती तर हवीच, आणि ती कालांतराने वा बदलत्या विचारसरणीनुसार घडतेही, परंतु ती होत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतो, परिणामी त्याचे दुष्परिणामही दिसू लागतात. या सर्व बाबी मी माझ्या विचारांतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे,

प्रगती शुन्याकडे – विषय म्हंटलं तर मजेशीर पण तसाच गंभीर आणि विचार करायला भाग पाडेल असा आहे. प्रगती तर हवीच, आणि ती कालांतराने वा बदलत्या विचारसरणीनुसार घडतेही, परंतु ती होत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतो, परिणामी त्याचे दुष्परिणामही दिसू लागतात. या सर्व बाबी मी माझ्या विचारांतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तुमच्या प्रतिक्रियांमधून ते कितपत यशस्वी होईल हे लवकरच समजेल. माझे ह्या विषयाबद्दलचे विचार मी काही मुद्द्यांवरून स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.

स्थलांतर – स्थलांतर म्हणजे काही कारणास्तव एका भौगोलिक स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत केलेला प्रवास, जो तात्पुरता वा कायमस्वरूपी असू शकतो. स्थलांतर करण्यामागे बरीच करणं असू शकतात परंतु जी प्रमुख आणि महत्वाची म्हणता येतील ती आहेत – नैसर्गिक, सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक, व शैक्षणिक ई. आता आपण स्थलांतरामागची कारणं जाणून घेतली पण सर्वश्रुत असलेलं मूळ कारण एकच आहे ते म्हणजे आयुष्य जगताना लागणारी स्थैर्यता. आयुष्य जगताना नमूद केलेल्या कोणत्याही कारणांमुळे येणारे अडथळे कोणालाही नकोच असतात. चला आता कारणं तर पाहिली परंतु वास्तविक जीवनातली उदाहरणंही लक्षात घेऊ आणि ती टाळता येऊ शकतात का याचाही आढावा घेऊ.

वरील कारणांपैकी नैसर्गिक आपत्ती व सामाजिक कारणांमुळे होणारे स्थलांतर आपण टाळू शकणे कठीण आहे. जिथे वारंवार भूकंप, वादळ वा महापूर अशा नैसर्गिक आपत्ती येत असतील आणि जिथे पिढ्यानपिढ्या चालत आलेले सामाजिक तेढ असतील, तेथील लोकांना कायमस्वरूपी स्थलांतर करणे भाग आहे. आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतराचे मी व्यक्तिगतरीत्या पूर्णपणे समर्थन करत नाही, तसेच हि स्थलांतरे माझ्या मते तरी कायमस्वरूपी नसावी. उदाहरणं घ्यायची झाली तर कौटुंबिक समस्या, शहराची ओढ, आणि अधिकाधिक पैसे कमावण्याची इच्छा, ठोस उदाहरण म्हणजे मुंबई नगरी, जिथे येण्याची धडपड बरेचजण करत असतात, काहींना यश मिळते तर काहींना निराशा. काहीजण तर वडिलोपार्जित जमीन, एकत्र कुटुंबपद्धती व नैसर्गिक जीवन सोडून मुंबईच्या वाटेला लागतात व घड्याळाच्या काट्याला बांधल्यासारखे आयुष्य जगतात. आपण जिथे आहोत त्याच ठिकाणी प्रयत्न आणि आपल्या कला-कौशल्याचा योग्य उपयोग करूनही सुंदर समाधानी आयुष्य जगू शकतो.
आता शैक्षणिक कारण, पण हेही आता कारण राहिलेलं नाही कारण काही अपवाद वगळता गावोगावी शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. इथे गंमत अशी आहे कि उच्चशिक्षणासाठी म्हणजेच डॉक्टर, इंजिनिअर बनण्यासाठी मुलांना शहरांकडे यावे लागते आणि नंतर त्यानुसार नोकरी धंदा करण्यासाठी त्यांना शहरांतच वास्तव्य करावे लागते. माझ्या मते गावांतील वा शहरांतील मुलामुलींनी अनुरूप शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले तर हि समस्या थोडीफार प्रमाणात आटोक्यात येईल. उदा. ज्यांची पिढीजात शेती आहे त्यांनी शेतीविषयक ज्ञान घेऊन आधुनिकरीत्या शेती करून प्रगती करावी. ज्यांचा परंपरागत व्यवसाय असेल त्यांनी त्या त्या विषयाचे तांत्रिक शिक्षण घ्यावे व व्यवसायाला चालना द्यावी. असे बरेच पर्याय आता सरकारने उपलब्ध करून दिले आहेत, ज्याकडे सर्वसामान्यांचे दुर्लक्ष होत आहे आणि मोजक्या काही ऐकिवात असलेल्या शिक्षण पर्यायांकडे वळू लागलो आहोत. तरी यापुढे हि चूक आपल्याकडून होऊ नये हि आपलीच जबाबदारी आणि माफक अपेक्षा.
थोडक्यात काय तर स्थलांतर करून आपले प्रश्न पूर्णपणे सुटत नाही वा प्रगती होत नाही, तर आपण काही सुंदर गोष्टींना मुकत असतो व फक्त धावपळ पदरी पडते. हा मुद्दा फार थोडक्यात आवरता घेतला पण आशय समजून घ्यावा हि विनंती आणि पुढच्या मुद्द्याकडे वळूया.
स्पर्धात्मक युग – स्पर्धात्मक युग काय हे आपण सगळे वास्तविक जीवनामध्ये अनुभवतच आहोत, तरी इथे थोडक्यात सांगतो. स्पर्धा का वाढते तर अपेक्षा आणि मागणी. यामागची कारणे म्हणजे बदलती विचारसरणी आणि वाढती लोकसंख्या.
स्पर्धात्मक युगाचा जसा चांगला बदल दिसून येत आहे तसाच त्याचा पडसाद हि त्याची दुसरी बाजू. दुसरी बाजू अशी कि ह्या स्पर्धेच्या चढा-ओढीमध्ये बऱ्याच आघाड्यांवर बदल झाला आहे. लहान-मोठे व्यवसाय, सरकारी-खासगी नोकऱ्या, शिक्षण व्यवस्था, व परंपरागत व्यवसाय ई. पातळ्यांवर झालेला बदल जेवढा चांगला परिणामी तेवढाच विचार करायला लावणारा. आधुनिकीकरणामुळे परंपरागत तसेच लहान-मोठ्या व्यवसायांवर फार मोठी गदा आली आणि जिथे १०० माणसांची जागा एका यंत्राने घेतली, त्यामुळे झालेली मजूर कपात व परंपरागत व्यवसाय ठप्प झाले. मागणी वाढली, त्यानुसार बदल होऊन प्रगती झाली, पण दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढली, नोकर कपात झाली व गरिबी वाढली. अजून एक उदाहरण द्यायचं झालंच तर गावागावांमध्ये मोठमोठे प्रकल्प येऊन अनेक गावं स्थलांतरित झाली आणि लोकांना परंपरागत कामं सोडून मोलमजुरी करावी लागली. इथेही प्रगती झाली परंतु हि वजेची बाजू दुर्लक्षितच राहिली. सर्वांना न्याय मिळाला असेही नाही.

आता थोडा मजेशीर तेवढाच गंभीरपणे घ्यायचा विषय – शैक्षणिक पद्धती. आजची पिढी जे शिक्षण घेते त्यात आपण लहानपणापासून आपल्या मुलांकडून फार अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शिक्षणाच्या दबावाखाली आणतो. पुन्हा कारणं तीच आहेत, स्पर्धा आणि शिक्षणपद्धतीमधील बदल. आपली किंवा आपल्या आधीची पिढी म्हणजे आपले आई-वडील ह्यांनी घेतलेलं शिक्षण बघा. ह्या दोन वर्गांनी जे शिक्षण घेतले त्यावर त्यांनी स्वतःची वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक जबाबदारी संभाळलीच ना. त्यांनी ज्या शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षण घेतले त्यात मातृभाषा आणि स्थानिक भाषांना प्रथम प्राधान्य होते आणि नंतर प्रादेशिक. उदा. महाराष्ट्रामध्ये मराठीला प्रथम प्राधान्य आणि नंतर प्रादेशिक म्हणजे हिंदी व इंग्रजी. विद्यार्थीही आवडीने शिक्षण घेत होते. दुसऱ्या बाजूला आताची शिक्षणपद्धती बघितली तर स्थानिक भाषांचे प्राधान्य कमी झालेले दिसते आणि इंग्रजी भाषेमध्ये शिक्षणाची सक्ती अर्थात पर्याय उरला आहे. प्रगतीच म्हणूया आपण याला कारण स्पर्धा आणि बदललेली व्यवस्था.

यावर एक गंमत सांगतो, ती तुम्ही गंमत म्हणून घ्यायची कि त्यावर विचार करायचा हे तुम्हीच ठरवा. सद्यस्थितीची शिक्षणपद्धती पाहता आताच्या पिढीला स्वतःची मातृभाषाही नीट बोलता येत नाही, हा एक कटू अनुभव आहे, ज्याचा मला खेद वाटतो. आपण याकडे गंमतीने पाहतो पण पालकांनी आणि सरकारनेही याचा गंभीरपणे विचार करायला हवा.

बदलती जीवनशैली – बदलती जीवनशैली हा लेखात वर्णन केलेल्या मुद्द्यांचा एक भाग आहे असे मला वाटते. आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याला प्रगती म्हणावी कि अधोगती हे तुम्ही पुढे मांडलेल्या विचारांवरून ठरवा.

आपली पूर्वीची जीवनशैली पहा – मातीच घर, मातीची चूल, जास्तीत जास्त पायी प्रवास, परंपरागत व्यवसाय, निसर्ग सान्निध्य, एकत्रित कुटुंबपद्धती, कौटुंबिक विचार विनिमय, भेटीगाठी, प्रदूषण विरहित वातावरण त्यामुळे कमी आजारपण, स्पर्धा कमी त्यामुळे कमी दगदग, कष्टाची सवय, सुनिश्चित दिनचर्या, अजून बरेच काही. जसजसे प्रगतीच्या वाटेवर निघालो, तसतसे या सर्व गोष्टी एक-एक करत मागे पडू लागल्या. राहणीमान, जेवणपद्धती बदलली, नोकरी धंद्यामुळे दगदग वाढली आणि परिणामी आरोग्यावर वाईट परिणाम दिसू लागले. आता जी आधुनिक जीवनशैली आपण जगतोय ती वरवर तर फार सोयीस्कर दिसते पण तेवढीच तकलादू आहे. आपण एक नकली जीवन जगत आहोत. आता उदाहरणासह स्पष्टीकरण देतो. पहिलं तर आपल्याला शारीरिक कष्टाची सवय कमी झाली आहे, त्यामुळे मग व्यायामाच्या नवनवीन पर्यायांकडे धावपळ करून त्यामागे पैसे आणि वेळ खर्ची जात आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी हि आपल्याला अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे. दुसरं उदाहरण थोडं हटके आहे. आजकाल आपण पारंपरिक जेवणही बाहेरून मागवून त्याचा आस्वाद घेतो व मोठ्या गर्वाने त्याचा मित्रमैत्रिणींकडे उल्लेख करतो. किती हे हास्यास्पद. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण आपली परंपरा आणि पारंपरिक जीवन पद्धती जपायला कमी पडलोय.

थोडक्यात मुद्दा मांडला कारण मी जे मुद्दे मांडत आहे त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे आणि थोडक्यात संपवणं त्याहूनही कठीण.

निसर्गाचा असमतोल – हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण तो ह्या लेखाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. प्रगती करता करता आपण जसे स्वतःच्या आयुष्यात बदल घडवले तसेच निसर्गाकडेही दुर्लक्ष केले, ज्याचे फार मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.

बदललेली जीवनशैली, स्पर्धा, आधुनिकीकरण आणि हे सर्व करताना आपल्या सर्वांचे झालेले दुर्लक्ष यामुळे निसर्गाचा असमतोल वाढला आहे. गावांचे झालेले शहरीकरण, वाढते कारखाने, वाढत्या लोकसंख्येमुळे झालेले भौगोलिक बदल, आणि अशी अनेक कारणं आहेत. वाढते उद्योगधंदे आणि कारखान्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण तसेच वायुप्रदूषण वाढले. वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी वाढली, त्यामुळे शहरांची वाढ झाली परिणामी शहरांची वाढ होताना निसर्गाची हानी होत आहे. असेच काही जगाच्या पाठीवर अन्य ठिकाणीही घडत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणजे “ग्लोबल वॊर्मिंग”. ह्या ग्लोबल वॊर्मिंगचा फटका जगातील सर्वच देशांना कमीजास्त प्रमाणात बसत आहे. ऋतुमान व तापमानात झालेले बदल हा त्याचाच एक भाग आहे. निसर्गाने जसे आतापर्यंत आपल्याला जपले आहे तसेच आपलीही जबाबदारी आहे त्याला जपण्याची. जर आपण त्यात कुचराई केली तर निसर्ग आपला प्रकोप दाखविल्याशिवाय राहणार नाही.

आतापर्यंत अनेक हवामानखात्याच्या अंदाजानुसार जगबुडीचे संकेत दिले गेले आहेत, त्यावर काही भाषांमध्ये चित्रपटही आले ज्यात जगबुडीची वर्ष, कारणं, इतकंच काय तर तारीखही सांगण्यात आली. सुदैवाने आतापर्यंत असा अनर्थ घडला नाही, परंतु जगभरात अशा अनेक घटना घडत आहेत कि ज्या जणू जगबुडीचे संकेतच देत आहेत. आपण आता ज्या वळणावर आहोत जिथे आपल्याला हा अनर्थ काही काळ थोपवता येईल पण रोखता येणार नाही. हा काही घाबरवण्याचा दृष्टिकोन नाही, पण सद्यस्थिती पाहता हि वस्तुस्थिती विचाराधीन आहे.

वरील सर्व मुद्द्यांचा व घटनाक्रमांचा आढावा घेता हे लक्षात आले असेल कि आपण सर्व स्तरांवर प्रगती तर केली पण हीच प्रगती आपल्याला शुन्याकडे घेऊन चालली आहे.

हा लेख हा सर्वस्वी माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून केलेला विचार आणि मत आहे, परंतु ह्यात काहीतरी तथ्य आहे हे कळलेच असेल व त्यावर विचार व्हावा हि विनंती वजा आशा बाळगतो.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा .

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *